पुस्तक दिन
नमस्कार मैत्रिणींनो, आज प्रथमच मी तुमच्याशी हितगुज करण्यासाठी आले आहे. माझा आजचा विषय आहे "पुस्तक दिन". तुम्ही म्हणाल पुस्तक दिन, हो कारण आपण सर्वजणी आपल्या संसारामध्ये नोकरीमध्ये अगदी लोणच्या प्रमाणे मुरलेलो आहोत. आपल्या दैनंदिन जीवनामधील पुस्तकाचे स्थान फारच दुर्मिळ झाले आहे. माझ्या काही मैत्रिणी पुस्तक वाचत असतील परंतु त्यादेखील अगदी बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. म्हणून मी आज पुस्तक दिनाचे औचित्य साधून तुम्हाला भेटायला आले आहे. आपण मागे आपल्या शालेय जीवनात जर गेलो तर आपल्या सर्वांना आठवेल की शाळेच्या भिंतीवर किंवा फळ्यावर नेहमी एक वाक्य लिहिलेले असायचे ते म्हणजे "वाचाल तर वाचाल" तेव्हा अगदी आपण नित्यनेमाने वाचत असायचो. आपले शिक्षक देखील आपल्याला सांगायचे शालेय पुस्तकां बरोबर अवांतर पुस्तके वाचत जा,आपण सर्वजणी तेव्हा पुस्तक वाचन करायचो, परंतु आता आपण त्याकडे दुर्लक्ष केले आहे. संत तुकाराम महाराज देखील म्हणतात की,'आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने' याचा अर्थ असा की ग्रंथरूपी ज्ञानाला महाराज संपत्ती समजतात या संपत्तीची बरोबरी सोने, चांदी किंवा रत्नाशी होत नाही. ...